Monday, 17 July 2017

कामगार दिन कसा सुरू झाला ?

औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली.

प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव घेतला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली आणि त्यानंतर १८९१ पासून १ मे’ हा कामगारदिन पाळण्यास सुरुवात झाली.

●काय होत्या कामगारांच्या मागण्या ?
-कायद्याने ८ तासांचा दिवस.
-लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी.
-महिला कामगारांच्या कामावर मर्यादा.
-रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम.
-कायद्याने साप्ताहिक सुट्टी.
-कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
-समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य.
"आठ तास काम, आठ तास आराम व आठ तास मुक्त जगण्यासाठी"असे गीतही तयार करण्यात आले होते.

●भारतातील पहिला कामगार दिन
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.

●आंतरराष्ट्रीय कामगार दिन
देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणा-या कामगारांचा गौरव करण्यात येतो.
      

No comments:

Post a Comment